परीक्षा-चिंता-भिती-कारणे-परिणाम आणि उपाय


 Key Points


परीक्षा म्हणजे काय?

परीक्षा म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयातील असलेल्या ज्ञानाची तपासणी. परीक्षा ही एक औपचारिक चाचणी आहे. आपण आपले एखाद्या विशिष्ट विषयातील ज्ञान, कौशल्य, योग्यता, प्रगती, पात्रता किंवा क्षमता दर्शविण्यासाठी किंवा त्या विषयातील पात्रता मिळविण्यासाठी परीक्षा घेतली जाते किंवा दिली जाते. यामध्ये एखाद्या व्यक्तीचे ज्ञान तपासण्यासाठी, ज्ञानाचे योग्य मूल्यांकन करण्यासाठी विविध स्वरुपाच्या प्रश्नांची मालिका किंवा एक समूह तयार केलेला असतो.  

[Back to the key points]


परीक्षेचा आपणास काय उपयोग होतो?

परीक्षा आपणास अधिक सहजपणे माहिती मिळविण्यास, शिकण्यास आणि स्मरणात ठेवण्यास भाग पाडतात. विद्यार्थ्यांवरती चांगले मार्क्स, चांगली श्रेणी मिळवण्याची जबाबदारी असल्यामुळे ते सतत प्रयत्नशील राहतात. विद्यार्थ्याने विशिष्ट विषयामध्ये किती ज्ञान मिळविले आहे याची खात्री करण्यासाठी परीक्षा पध्दती वापरली जाते. वयोगटानुसार परीक्षा पध्दती विद्यार्थी वरच्या वर्गात जाण्यास सक्षम आहे किंवा नाही हे ठरवते.

[Back to the key points]


परीक्षेच्या भितीने कोणता त्रास होऊ शकतो?

परीक्षार्थी एखाद्या महत्त्वपूर्ण परीक्षेपूर्वी, परीक्षे दरम्यान, परीक्षे नंतर किंवा नियमितपणे जास्त चिंताग्रस्त होत असल्यास किंवा भिती वाटत असल्यास त्या परीक्षार्थिस टेस्टोफोबिया होऊ शकतो. याला मुख्यतः एक्स्सीनोफोबिया किंवा परीक्षा ताप असेही म्हणतात.

टेस्टोफोबिया म्हणजे परीक्षेविषयीची असमंजसपणाची भिती, जी नेहमीच्या चिंतेपेक्षा भिन्न असते. यामध्ये विशेषत: दैनंदिन जीवनात नेहमीपेक्षा जास्त अस्वस्थता जाणवते, सतत चिंतेत असल्यामुळे निद्रानाश होतो. पॅनीक आणि चिंताग्रस्त हल्ले पॅनीक डिसऑर्डर म्हणून वारंवार होऊ शकतात.

चिंताग्रस्त होणे ही विद्यार्थ्यांमध्ये असलेली एक सामान्य गोष्ट आहे. खासकरुन जेव्हा एखादी अतिशय महत्त्वाची परीक्षा जवळ आलेली असते, परीक्षेमध्ये एखाद्या विषयाचा पेपर अवघड गेलेला असतो किंवा परीक्षेच्या निकालाची वेळ जवळ आलेली असते तेंव्हा विद्यार्थी जास्त्‍ा चिंताग्रस्त झालेले आढळतात.

[Back to the key points]


परीक्षेच्या भितिची मूळ कारणे कोणती आहेत?

आपण परीक्षा चालविणा-या प्रणालीचा अविभाज्य भाग आहोत. परीक्षेतील आपल्या कामगिरीवरुन आपल्यामध्ये असलेल्या क्षमतेला न्याय दिला जातो. परीक्षा प्रणाली एखाद्या व्यक्तीच्या वृत्ती आणि योग्यतेचे खरोखर मूल्यांकन करते. परीक्षा प्रणाली एखाद्या व्यक्तीच्या स्थिर आणि सुसंगत गुणवत्तेचे मूल्यांकन करते. परीक्षा प्रणाली परीक्षार्थिचे सातत्यपूर्ण सर्वंकश मूल्यमापन किंवा मूल्यांकन करते. शैक्षणिक वर्षामध्ये सातत्याने अभ्यास करुन दिलेल्या परीक्षेचे सर्वंकश मूल्यमापन परीक्षा प्रणाली करते.

भारतीय शिक्षण पध्दतीमध्ये परीक्षा हा केंद्रबिंदू मानून मूल्यमापन केले जात असल्यामुळे परीक्षेला अनन्यसाधारण महत्व दिलेले आहे. त्यामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षक यांचा परीक्षेबाबतचा वेगळा दृष्टिकोन तयार झालेला आहे. पालकांना विद्यार्थ्यांकडून चांगले गुण अपेक्षित असतात, त्यामुळे शिक्षकही विद्यार्थ्यांना परीक्षा महत्वाची आहे म्हणून त्या दृष्टिने शिक्षण देतात.  

भारतीय परीक्षा पध्दती भिती व चिंतेने पछाडली आहे आणि बहुतेक शिक्षक आणि पालक भितीचा उपयोग करुन मुलांना अभ्यासासाठी आकर्षित करतात. परीक्षेच्या भितीवर मात करण्यासाठी येथे काही महत्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत.

भारतात परीक्षांमुळे पूर्णपणे भिन्न वातावरण निर्माण होते. पालकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत प्रत्येकजण मानसिक तणावाखाली असतो. याचा सखोलपणे विचार केला तर त्याचे कारण वाढती स्पर्धा आणि गुणांची तुलना हे आहे.

पालकांना त्यांच्या सामाजिक स्थितीबद्दल ताण येत असताना, निरागस मुले त्यांच्या पालकांना या टप्प्यातून जाताना पाहतात. या व्यतिरिक्त, साथीदारांचा दबाव आणि शाळेचा दबाव परिस्थिती अधिक खराब करतात.

परीक्षेची भिती ही एक सामान्य गोष्ट आहे जी तुम्हाला परीक्षेत भाग घेणा-या प्रत्येक विद्यार्थ्यात आढळू शकते. जरी हे फारसे असामान्य नसले तरी आपण आपली परीक्षा देतो तेव्हा त्याचा नकारात्मक परिणाम होतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे विद्यार्थ्यांवर येणारा मानसिक दबाव. विद्यार्थ्यांकडून असलेल्या पालक आणि शिक्षकांच्या अपेक्षा.

विशेष: बोर्ड परीक्षेमध्ये पालक आणि शिक्षकांकडून अधिक गुणांची अपेक्षा असते. जे विद्यार्थी बोर्ड परीक्षेला सामोरे जातात अशा विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेची भीती किंवा तणाव निर्माण होते. ज्यामुळे ते चांगले प्रदर्शन करु शकणार नाहीत.

[Back to the key points]


परीक्षेच्या भितीवर मात करण्यासाठी आणि चिंता कमी करण्यासाठी काय करावे?


अभ्यासाचे स्वतःचे वेळापत्रक तयार करा

विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये चांगले यश संपादन करायचे असेल तर, शैक्षणिक वर्षाच्या सुरुवाती पासूनच तयारीला लागले पाहिजे. यामध्ये सर्वात अगोदर अभ्यासाचे नियोजन करणे महत्वाचे आहे. आपला दररोज शाळेत जाणारा वेळ आणि घरी अभ्यासासाठी मिळणारा वेळ यांची योग्य सांगड घालून अभ्यासाचे एक-एक महिण्याचे वेळापत्रक तयार करावे. एकाचवळी संपूर्ण वर्षाचे वेळापत्रक तयार करु नये.

वेळापत्रक तयार करताना आपल्याला कठीण वाटणा-या विषयांच्या अभ्यासाठी जास्त्‍ा वेळेचे नियोजन करावे. नियमितपणे नियोजनाप्रमाणे अभ्यास करावा. प्रत्येक महिण्याच्या अखेरीस केलेल्या अभ्यासाचा आढावा घेऊन पुढील महिण्याचे वेळापत्रक तयार करावे. जर मागील महिण्यातील अभ्यास पूर्ण झाला नाही तर पुन: नवीन वेळापत्रकामध्ये राहिलेला अभ्यास समाविष्ट करावा.

अशाप्रकारे वर्षभर नियाजनाप्रमाणे अभ्यास केल्यास परीक्षेपूर्वी संपूर्ण अभ्यास पूर्ण होतो. त्यामुळे परीक्षा जवळ आल्यानंतर अभ्यासाचे दडपण मनावर राहात नाही. परीक्षेची तयारी चांगली झालेली असल्यामुळे परीक्षेच्या कालावधीत अभ्यासाचा अधीक ताण पडत नाही. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत नाहीत. परिणामी संपूर्ण परीक्षा तणावरहित पार पडते. त्याचा परिणाम चांगले गुण मिळवण्यावरती होतो.

[Back to the key points]


अभ्यासाची सुरुवात योग्य वेळी करा

इंग्रजीमध्ये एक जुनी म्हण आहे “Well begun is half done.” चांगली सुरुवात म्हणजे अर्धेकाम झाल्यासारखे आहे. या म्हणीचा प्रत्यक्षात लिहिल्याप्रमाणे अर्थ होत नाही, परंतु याचा अर्थ असा होतो की, योग्य वेळी सुरुवात करणे व प्रयत्न करणे हे महत्वाचे आहे कारण आपण वास्तविक कृती केल्याशिवाय भविष्यातील घटनेचे मोजमाप करु शकत नाही.

आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते ते प्रथम अनुभवणे. म्हणूनच, आपण प्रारंभिक पाऊल उचलण्याचे धाडस केल्याने, आता फक्त अर्धे काम उरलेले आहे. शेवटपर्यंत धैर्य टिकवण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुरुवात महत्वाची आहे.  

कोणत्याही कामाची सुरुवात योग्य वेळी करावी. 11 th Hour ची वाट पाहू नका.  परीक्षेच्या दोन दिवस आधी आणि परीक्षेच्या एक रात्र आधी विश्रांतीसाठी ठेवणे आवश्यक आहे. आणि विद्यार्थ्यांनी शांत राहण्यासाठी ध्यान करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. परीक्षेच्या एक रात्री आधी महत्वाच्या भागांचे धावते वाचन करा.  

[Back to the key points]


योजनाबद्ध अभ्यास करा

अभ्यासाच्या योजनेद्वारे आपण लवकर अभ्यास करण्यास सुरवात करु शकता. त्यामुळे आपल्याकडे तयारीसाठी पुरेसा वेळ असेल. लक्षात ठेवा पुनरावृत्ती महत्वाची आहे आणि अधिक अभ्यासाचा अर्थ म्हणजे अधिक प्रभावीपणे आठवणे. दररोज आपल्याला कोणता अभ्यास केंव्हा करायचा याची रुपरेषा आपल्याला अभ्यासात मदत करते. अभ्यासाच्या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळतो. अभ्यास योजना आपल्याला आपला ताण कमी करण्यास मदत करेल. बहुतेक विद्यार्थी अभ्यास सुरु करण्यासाठी शेवटच्या क्षणाची वाट पाहतात. त्यामुळे त्यांच्यावर अभ्यासाचा अचानक ताण येतो त्यामुळे आजारी पडण्याची भिती असते.

परीक्षेच्या वेळी, विषयाचा अभ्यास आठवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे फ्लो चार्ट, आलेख आणि चित्रे. हे आपल्याला विषयातील महत्वाचा भाग सहजपणे समजून घेण्यास मदत करतात आणि त्याचबरोबर कित्येक वर्षांपर्यंत हे लक्षात राहते.

[Back to the key points]


नियोजनात सर्व विषयांचा समावेश करा

अभ्यासाचे नियोजन करताना कधीही एका विषयावर लक्ष केंद्रित करु नका. एखादा विषय कठीण वाटतो म्हणून त्याकडेच अधिक लक्ष केंद्रित करतांना इतर विषयांच्या अभ्यासाकडेही लक्ष देणे तितकेच महत्वाचे आहे.

अशा प्रकरणांमध्ये, इतर विषय अभ्यासातून वगळले तर ऐनवेळी इतर विषयांचा अभ्यास कव्हर  होणार नाही. इतर विषयांची तयारी करण्यासाठी दररोज किंवा वैकल्पिक दिवसांमध्ये प्रत्येक विषयासाठी नियमित अभ्यासससाठी थोडा वेळ देणे योग्य आहे.

[Back to the key points]


विश्रांतीसाठी वेळ द्या

बराच वेळ सतत अभ्यास करणे केवळ कंटाळवाणेच नव्हे तर आरोग्यासाठीही वाईट आहे. आपल्या शरीराला विश्रांती घेण्यासाठी दर तासाभरानंतर ब्रेक घेणे महत्वाचे आहे. आपल्या शरीरास ताण दया, शरीराला पुन्हा चैतन्य देण्यासाठी ब्रेक दरम्यान पाणी किंवा रस प्या. आरोग्य तज्ञांच्या मते, शरीरास ताण दिल्यास शरीरातील अभिसरण सुधारण्यास मदत होते.

[Back to the key points]


नियमित, पुरेसी झोप घ्या

शाळेच्या नियमित दिवसात, शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी चांगली विश्रांती म्हणजे चांगली झोप आवश्यक आहे. दररोज किमान सहा ते सात तासांची झोप आवश्यक असते. त्यासाठी आपण आपले अभ्यासाचे वेळापत्रक तयार करताना झोपेच्या वेळेचाही विचार करणे आवश्यक आहे. आपण झोपेचे नियोजन करण्यात अयशस्वी झाल्यास, आपण आपल्या पालकांची मदत जरुर घ्यावी.

[Back to the key points]


स्वतः नोट्स तयार करा

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून अभ्सास करत असतांना पाठयपुस्तकांच्या आधारे प्रत्येक घटकावर आाधारित स्वतः नोट्स तयार करा. प्रत्येक घटक समजून घेऊन त्यावर जेंव्हा आपण नोटस तयार करतो, तेंव्हा तो भाग दिर्घकाळ स्मरणात राहतो.

स्वतः नोट्स तयार करत असताना महत्वाच्या तारखा, घटना आणि नावे यांना हायलाइट करा.  यामुळे परीक्षेच्या वेळी उत्तरे आठवताना याची फार चांगली मदत हाते. आपली उत्तरे स्मरणात ठेवण्यासाठी नोटसमधील हायलाइट केलेला भाग पटकन आठवतो.

[Back to the key points]


सुंदर व सुवाच्च  हस्ताक्षरात उत्तरे लिहा

सुंदर व सुवाच्च हस्ताक्षर हा एक मौल्यवान अलंकार आहे. ज्याप्रमाणे सुदर अलंकाराणे स्रीचे सौंदर्य खुलते त्याप्रमाणे सुंदर व सुवाच्च हस्ताक्षरामध्ये लिहिलेल्या उत्तरपत्रिकेच्या सुंदरतेत भर पडते. उत्तरपत्रिका पाहताक्षणी परीक्षकही आनंदीत होतो. त्याचा परिणाम चांगल्या गुणांवरती होतो.

मुलांच्या हस्ताक्षराकडे सुरुवातीपासूनच लक्ष देणे हे पालकांचे आणि शिक्षकांचे कर्तव्य आहे. लहान वयामध्ये अक्षरे वळणदार लिहिण्याची सवय लागली तर ती पुढे कायम राहते.

हाताला चांगले वळण असले तरी अनेकदा परीक्षेच्या दबावाखाली मुले त्यांच्या लिखाणावर लक्ष देत नाहीत. वेळेचे नियोजन नसल्यामुळे पेपर संपविण्याचा प्रयत्न करत असताना मुले हस्ताक्षराकडे लक्ष देत नाहीत. म्हणूनच वेळ व्यवस्थापन कौशल्य सुधारण्यासाठी शाळेमध्ये वर्गात आणि घरी पेपरचा सराव करण्याची गरज आहे.

[Back to the key points]


हायलाइटर्स वापरणे

उत्तरपत्रिकेमध्ये हायलाइटरचा योग्य वापर करा. हायलाइटरचा योग्य वापर परीक्षकास या विषयाबद्दलचे आपले ज्ञान समजणे सुलभ करते. आणि आपली चांगली छाप तयार करण्यात मदत करते. तसेच, परीक्षेच्या तयारी दरम्यान हायलाईटरचा वापर केल्याने आपल्याला त्या विषयाच्या महत्त्वपूर्ण बाबी लक्षात ठेवण्यास मदत होते.

[Back to the key points]


शीर्षके आणि उपशीर्षकांचा  वापर करा 

उत्तरे लिहताना उत्तरपत्रिकेमध्ये शीर्षक आणि उपशीर्षक (प्रमुख आणि उपप्रमुख) वापरा. त्यामुळे परीक्षकास सर्व उत्तर सविस्तर मुद्देसूद लिहिले आहे हे समजणे सुलभ जाते, तसेच ते व्यवस्थित दिसते. उत्तरांची गुंतागुत व गोंधळ टाळण्यासाठी आणि अनुक्रमवार माहिती प्रदान करण्यासाठी परिच्छेदांचा वापर करा

[Back to the key points]


निष्कर्ष

वरील सर्व बाबींचा विचार केल्यास असे लक्षात येते की, आपण स्विकारलेल्या परीक्षा पध्दतीला समर्थपणे तोंड देण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. त्यासाठी न घाबरता,  न डगमगता शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून नियोजनबद्ध अभ्यास केल्यास तुम्हाला चांगले गुण मिळविण्यापासून कोणीही रोखू शकनार नाही.

नेहमी लक्षात ठेवा….

प्रत्येकामध्ये अलौकिक बुद्धिमत्ता आहे, तिचा योग्य वापर करा. माझ्याकडे पुरेसा वेळ नाही असे म्हणू नका. जीवनाचा एकच नियम आहे: कधीही हार मानू नका. आलेली अडचण एक संधी आहे असे समजा. आपले भविष्य स्वत: चे आभार मानेल असे काहीतरी करा. उद्याचा विचार करु नका, हातातील कामाबद्दल विचार करा. भविष्याचा अंदाज घेण्याचा उत्तम मार्ग म्हणजे मी तयार आहे. दृढनिश्चयाने उठून समाधानाने झोपा. हार न मानता पराभव करणे ही पृथ्वीवरील धैर्याची सर्वात मोठी परीक्षा आहे. मनाला ताण देऊ नका, पूर्ण प्रयत्न करा, बाकीचे आपोआप होईल. अल्बर्ट आईन्स्टाईने म्हटले आहे “काहीतरी हालचाल होईपर्यंत काहीही होत नाही.” तर नॉर्मन वॉन म्हणतो, “मोठे स्वप्न पहा आणि अयशस्वी होण्याचे धाडस करा.”

  [Back to the key points]

आपणास हा लेख आवडल्यास आपला अभिप्राय किंवा सूचना जरुर कळवा.

धन्यवाद….!

आमचे मुलांविषयीचे खालील लेख वाचायला देखील आपणास आवडतील.